सफर रामशेज आणि देहेरगडाची (Trek to Ramsej and Dehergad fort)

गड किल्ले राखावे, पराक्रमाचा तमाशा दाखवावा;
राजश्री आबासाहेबांचे संकल्पित तेच आम्हास करणे अगत्य |

कुठेतरी वाचलेलं, छत्रपती संभाजी राज्यांच्या एका पत्रातील हे वाक्य! 
शंभू राजे छत्रपती झाल्यावर त्यांच्या जीवनाचा आणि असाधारण मुत्युचाही आढावा घेतला असता, पदोपदी आपल्याला या वाक्याची प्रचिती येते. याचं शंभू राजांचा मुसद्दीपणा आणि आम्हा चिवट मराठयांचा इतिहास ठासून सांगणारा 'रामशेज', आमचा आजचा पहिला किल्ला. औरंगजेबाला सुमारे साडेपाच वर्ष झुंजवणारा आणि या लढ्यात हात हलवत माघार घ्यायला लावणारा...रामशेज. हा किल्ला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास खूपच मोठा आहे.

शहाजहान हा जेव्हा शहाजीराज्यांच्या विरोधात दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने त्याच्या दख्खन मोहिमेचा मुहूर्त 'रामशेज' हा निजामशाहीचा किल्ला घेऊन केला. आपल्या वडिलांचा तक्ता गिरवत औरंगजेब, महाराज्यांच्या मृत्यूनंतर, स्वराज बुडवायला आपली साडेपाच लाखांचं सैन्य घेऊन उत्तरेतुन निघाला. दख्खन मोहिमेची सुरवात रामशेज घेऊन करायचा त्याचा मानस होता. मुघलांच्या ताब्यातील गुलशनाबाद (नाशिक) पासून १० मैलावर असलेला 'रामशेज' हा घ्यावा म्हणून त्याने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ४० हजार सैन्य, तोफखाना यांच्यासह पाठविले आणि तो किल्ल्याभोवती वेढा टाकून बसला. या वेळी किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते, आणि त्यांचा झुंजार किल्लेदार. दुदैवाने त्या किल्लेदाराच नाव, पुरेश्या कागदपत्रांच्या आभावे अवगत नाही. मुघलानी गडावर पहिला हल्ला चढवला आणि मावळ्यांच्या दगडाच्या मऱ्यात परत फिरला. शहाबुद्दीन जवळ जवळ २ वर्ष किल्या घेण्याचा प्रयत्न करत राहिला पण त्याला यश आलं नाही. मग औरंगजेबाने, 'खान जहान बहादूरखान कोकलताश' याला मदतीसाठी पाठवले. यानेही बरेच प्रयत्न केले; तोफांसाठी डोंगरएव्हढे दमदमे उभारले ते पण तटबंदी भेदू शकले नाहीत. मग त्याने दूसरी योजना केली, दारुगोळा, तोफा, वाध्ये एका ठिकाणी गोळा केले जेणेकरून या बाजूने हल्ला होईल म्हणून मावळे बेसावध होतील आणि एक लहान तुकडी दुसरीकडून जाऊन किल्ला घेतील. पण या गनिमी काव्याचे जनक मराठेच होते, त्यांनी सैन्य विभागून मुघलांची पुन्हा फजिती केली. एवढे प्रयत्न करूनही अपयश पदरी पडलेल्या बहादूरखानाने मग दैवाची साथ घेतली, ऐका मंत्रिकाकरवी १०० तोळा वजनाचा सोन्याचा नाग अग्रभागी घेऊन किल्ल्यावर चाल केली आणि वरून आलेल्या दगडाने त्या मंत्रिकालाच टिपल्यावर पुन्हा मागे धूम ठोकली. आता साडे तीन वर्षे उलटूनही किल्ला येत नाही म्हणून वैतागून औरंगजेबाने तिसरा सेनापती बदलला; कासम खान. यालाही काही यश येत नव्हतं, याच गमक म्हणजे..शंभू राजांचा मुसद्दीपणा. या पूर्ण काळात किल्ल्याच्या वेढ्याला, बाहेरून त्रास देण्याचं आणि रसद तोडण्याचं काम राजांनी 'मानाजी मोरे आणि रुपाजी भोसले' या सरदारांना दिलं होतं आणि ते हे चोख बदवत होते. सुमारे साडेपाच वर्ष मराठ्यांनी अशी कडवी झुंज दिल्यावर औरंगजेबाने या किल्ल्याचा नाद सोडला. पुढे हा किल्ला बदलेल्या किल्लेदाराच्या फितुरीने मुघलांना मिळाला. 

आजून एक आख्यायिका या किल्ल्याच्या नावाला जोडलेली आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात पंचवटीत होते तेव्हा ते इथे आरामसाठी येत असत म्हणूनच 'रामशेज' म्हणजेच रामाची शय्या.

हा झाला इतिहास आता भूगोल पाहू...आमच्या नजरेतून
किल्ला तसा लहानसाच आहे. गडाची उंची साधारण ३२०० फुट एवढी आहे. नाशिक पासून पुढे पेठ मार्गावर आशेवडी या गावाजवळ हा किल्ला आहे. किल्ल्याची वाट डाव्या बाजूने जाते. काही चांगल्या तर काही ढासळलेल्या पायऱ्या चढून आम्ही मंदिराजवळ आलो. एका गुहेत बांधलेलं रामाचं मंदिर सुंदर आहे. मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला एक लहानशी गुहा आहे तीत शंकराची लहानशी पिंड आणि नंदी ठेवला आहे. या गुहेच्या छताला एक दगडाचा झरोका आहे तो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून असलेल्या चोर दरवाज्याचा आहे. मंदिराच्या मागेच एक पाण्याचं कुंड आहे, यातले पाणी पिण्यायोग्य आहे. या पाण्याची चव घेऊन डाव्या बाजूला असणाऱ्या काही पायऱ्या तुडवत आम्ही गडमाथ्यावर आलो. इथे समोरच जमिनीत खोदलेला चोरदरवाजा आहे. हा दरवाजा गडाच्या दुसऱ्या बाजूने उघडतो पण आता मातीत बुझुन गेलेला आहे. दरवाज्याच्या कमानी आजही लक्ष वेधून घेत होत्या. हा दरवाजा नंतर पाहू म्हणून आम्ही उजवीकडे वळालो. लगेचच उजव्या बाजूला काही प्रशास्र पायऱ्या  घळीत किल्ल्याचा मुख्य दरवाजाला घेऊन गेल्या. या दरवाज्याच्या पुढे किल्ल्याची प्राचीन मुख्य वाट असावी. या किल्ल्याच एक वैशिष्ट म्हणजे मुख दरवाज्याला लागूनच एक लहानसा पायऱ्यांचा चोर दरवाजा खोदलेला आहे, याने एखादा लहानसा माणूस फक्त खाली जाऊ शकतोकारण याचं लहानसं कवडस्या सारखा एक्सिट पॉईंट. आधी सांगितल्या प्रमाणे हाच तो गुहेच्या छताचा कवडसा. इथे सचिन आणि माझी मतभिन्नता झाली, त्याच्या मते हा चोरदारवाजा नाही कारण त्याची साईझ सचिन पास होईल इतकीही नव्हती. पण मला तो चोरदारवाजा वाटला ते त्या एक्सिट पॉइंटच्या मागे, पायऱ्या संपतात तिथे कोरलेल्या लहानश्या देवडी मूळे. असो, दोघंही या विषयावर, घरी येईपर्यंत बोलत होतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उभ्या कातळात कोरलेल्या आहे, लागूनच कातळाचेच बुरुज उभे केले आहेत. दरवाज्यावर दोन लक्ष्मीकमळ कोरलेली आहेत दोन्ही बाजूंना, त्या काळातील वैभवाच प्रतिक. हा किल्ला साधारण १२०० वर्षे अगोदर राष्ट्रकुटांच्या कालावधीत बांधला गेला असावा पण अजूनही या कातळात चिनी हतोड्याचे घाव जिवंत दिसतात. प्रवेशद्वार पाहून आम्ही पुन्हा बाहेर येऊन उनजीवकडे, किल्ल्याच्या मुख्य भागी वळलो. थोडं पुढे गेल्यावर काही दगडात कोरलेली पाण्याची टाकी आणि बांधलेलं एक तलाव दिसलं. टाक्यांच्या वर देवीचं मंदिर दिसत होतं. या टाक्यांना उनविकडे आणि त्या मंदिराला उजवीकडे ठेवून आम्ही किल्ल्याचा दुसरा चोरदरवाजा पाहायला निघालो. हा दरवाजाही, जमिनीत खोदलेला असून खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत. त्या पार करून आम्ही एक दरवाज्यातून आम्ही एका सुंदर ठिकाणी पोहीचलो. समोर भोरगड आणि देहेरगडचा डोंगर आणि परिसर, ऊन-ढगांच्या लपंडावाट मन रामवून टाकत होता. इथे पाच-एक मिनिट बसून, काही प्रोफाईल फोटोजचा क्लिकक्लिकाट केला. या दरवाज्यातून वर गडमाथ्यावर जाताना काही आजून पाण्याची टाकी, उध्वस्त वास्तू लागल्या. फिरून देवीच्या मंदिरापासून आम्ही पुन्हा मुख्य दरवाज्या जवळ येऊन डावीकडे माची पाहण्यास निघालो. माचीवर एक पाण्याचं टाकं आणि एक अलीकडे लावलेला ध्वजस्तंभ आहे. इथे एका सापाचे दर्शन झाले आणि आम्ही पुन्हा दरवाज्यापाशी आलो. समोरचा राहून गेलेला चोर दरवाजा पहिला. हा दरवाजा गडाच्या दुसऱ्या बाजूला उघडतो पण आता बुझुन गेला आहे. दोन कमानी पार करून एका कातळात कोरलेल्या मोठ्या गुहेजवळ हा दरवाजा घेऊन गेला. पुढे जायची वाट बंद झाली आहे. हा चोर दरवाजा पाहून आम्ही आमची गडफेरी पूर्ण केली. किल्ला फिरायला आम्हाला दोन तास लागले, वर यायला जेवढा वेळ लागला होता त्यापेक्षाही जास्त. किल्ला आहेच तसा!














रामशेजवरून आम्ही निघालो पूर्वेला देहेरगडकडे. तो समोर दिसत होता म्हणून न विचारता आम्ही आशेवडी गाव गाठलं. देहेर आणि भोरगड हे दोन्ही किल्ले एकमेकांना लागून आहेत, पैकी भोरगडवर ऐरफोर्स ने रडार्स बसवलंइ आहेत म्हणून तिथे जाता येत नाही. एकाच खिंडीतून हे किल्ले वेगवेगळे केले आहेत. गाववल्याने सांगितलेले नो परमिशन ऐकून आम्ही मागे फिरलो आणि मुख्य रास्तानं, अशेवडीच्या पुढे ७-८किलोमीटर वर रासेवाडी गावाकडून लेफ्ट घेऊन 'देहेरवडी' गाठली. इथून किल्ला समोर दिसतो. डोंगराच्या सोंडेवरून किल्ला गाठायला दीड तास लागला. किल्ल्यावर पहाण्यासाख फारसं काही नाही आहे आता. पायऱ्या, एक उद्धस्त प्रवेशद्वार, आणि काही पाण्याची टाकी आहेत. याची गडफेरी आटपून आम्ही डोंबिवली गाठली. 



जाता जाता एक विचार..…. नेहमीच मनात येतो तो आमच्या. आमचा पर्सनल...
इतिहास.... साडे पाच वर्षांचा ज्वलंत लढा आणि विजय हिंदुस्थान बादशहा औरंगजेबविरुद्ध; पण आमच्या शालेय जीवनात एक ओळ सुद्धा नाही. बहुतेक दोन्ही छत्रपती भोसले आडनाव लावत होते म्हणून...गांधी किंवा नेहरू असते तर...दिवसागणिक वर्णन भोकवून घेतलं असतं आमच्याकडून शाळेत!.....
आम्ही शिकलो तो इतिहास परतंत्राचा, लोर्ड्स आणि गव्हर्नरचा....पण आमचा खरा इतिहास अशाच रक्ताने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा आहे...आणि तो सुरू होतो सिकंदरच्या काळापासून...
आम्हाला पुस्तकातून शिकवला जातो १५० वर्षांच्या गुलामीचा इतिहास पण आता मनात मात्र....स्वराज्य आणि स्वातंत्रलढा...

- वैभव आणि सचिन.

Comments